पायलट सुमित सभरवाल यांना अपघात टाळता आला नाही पण शेवटच्या क्षणातील निर्णयशक्ती अद्वितीय
अहमदाबाद | 13 जून 2025 – अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर केवळ काही मिनिटांत दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 या विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित सबरवाल यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
कॅप्टन सबरवाल हे मुंबईच्या पवई परिसरातील ‘हिरानंदानी गार्डन’ येथील जलवायू विहार या सोसायटीत राहत होते, जेथे लष्कर व हवाई दलातील निवृत्त अधिकारीही वास्तव्य करत आहेत.
कॅप्टन सुमित सबरवाल यांना विमान चालवण्याचा 8200 तासांचा प्रदीर्घ अनुभव होता. ते एअर इंडियाचे लाईन ट्रेनिंग कॅप्टन (LTC) होते, म्हणजेच इतर वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचे काम त्यांच्याकडे होते. एवढा मोठा अनुभव असूनही ही भीषण दुर्घटना घडल्यामुळे हवाई क्षेत्रातील अनेक जाणकारांनी हळहळ व्यक्त केली आहे.
पायलट सुमित सभरवाल “धैर्य आणि स्थिरतेचा सर्वोच्च नमुना
जेव्हा जीवन आणि मृत्यू यांच्यातील सीमारेषा केवळ काही सेकंदांवर उभी असते, तेव्हा घेतलेला निर्णय अनेकांच्या भविष्याला आकार देतो. अशाच एका हृदयद्रावक प्रसंगात, एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचे पायलट श्री सुमित सभरवाल यांनी दाखवलेले धैर्य आणि विवेक आज देशभरातून कौतुकास पात्र ठरत आहे.
मुंबईच्या पवई परिसरात राहणारे पायलट सभरवाल यांना कळले की विमान आता नियंत्रणात राहणार नाही आणि केवळ काहीशे फुटांवरून ते झपाट्याने जमिनीकडे येत आहे. अशा वेळी त्यांनी घाबरून न जाता आपल्या मानसिक संतुलनावर नियंत्रण ठेवत एक जबाबदार निर्णय घेतला — विमान अशा जागी वळवले जिथे टक्कर होऊन कमीत कमी हानी होईल.
विशेष म्हणजे, या परिसराजवळच २५,००० लोकसंख्येची दाट वस्ती होती. तज्ञांचे म्हणणे आहे की, जर विमान तिथे कोसळले असते, तर हानीचं प्रमाण अमाप झालं असतं. पण पायलट सभरवाल यांच्या विचारपूर्वक कृतीमुळे अनेकांचे प्राण वाचले.
महाभारतात श्रीकृष्णांनी ‘स्थितप्रज्ञ’ होण्याचा उपदेश दिला आहे – संकटसमयी भावनांच्या आहारी न जाता संतुलित बुद्धीने योग्य निर्णय घेणे. पायलट सभरवाल यांनी या स्थितप्रज्ञतेचं प्रत्यक्ष उदाहरण दाखवून दिलं.
अत्यंत मर्यादित वेळेत आणि भीषण तणावाच्या परिस्थितीतही त्यांनी जे निर्णय घेतले, ते प्रेरणादायक आहेत. दुर्दैवाने त्यांना आपला जीव गमवावा लागला, पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही.
त्यांच्या अद्वितीय धैर्याला, शौर्याला आणि कर्तव्यनिष्ठेला आमचा शतशः नमस्कार.
स्वर्गीय पायलट सुमित सभरवाल आणि या अपघातात बळी पडलेल्या सर्व निरपराध जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मुख्य पायलट सुमित सबरवाल शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील होते
MAYDAY कॉल करण्यात आला होता. टेकऑफनंतर लगेचच पायलटने इमर्जेंसी कॉल करत एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला काही महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा ATC कडून प्रत्युत्तर देण्यात आले, तेव्हा पायलट ते रिसीव्ह करू शकले नाहीत.
विमान उड्डाण करत असतानाच काही गंभीर तांत्रिक अडचण उद्भवली असावी, असा संशय विमानतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. माहितीप्रमाणे, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच पायलट सुमित सबरवाल यांनी अहमदाबाद विमानतळाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र काही क्षणांतच संपर्क तुटला. सुमित यांचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होता, पण आपत्ती इतकी गंभीर होती की काहीच शक्य झाले नाही.
केवळ एकच प्रवासी बचावला, उर्वरित 241 प्रवाशांचा आणि कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. विमान मेघाणी नगर भागात असलेल्या मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर्स हॉस्टेलवर आदळले. ज्या वेळी विमान हॉस्टेल च्या इमारतीला आदळले त्यावेळेस , जेवणाची वेळ असल्यामुळे विध्यार्थी जेवण करत होते,या हॉस्टेलमध्येही सुमारे 30 जणांचा मृत्यू झाला. अपघातावेळी विमानात सुमारे 1.25 लाख लिटर जेट फ्युएल होते, ज्यामुळे मोठा स्फोट झाला आणि परिसरात भीषण आग लागली.

कॅप्टन सुमित सबरवाल कौटुंबिक पार्श्वभूमी
कॅप्टन सुमित सबरवाल अविवाहित होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते आणि त्यानंतर ते आपल्या वडिलांची जबाबदारी पार पाडत होते. पायलटचा ताणतणावपूर्ण आणि सतत प्रवासाचा जीवनशैलीमुळे त्यांना घरी वेळ देणे अवघड जात होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी वैमानिकाची नोकरी सोडण्याचा विचारही व्यक्त केला होता, पण नियतीने त्यांना दुसराच मार्ग दाखवला.
विमान दुर्घटनेनंतर पवईतील त्यांच्या घरी स्थानिक रहिवासी आणि आमदार दिलीप लांडे यांनी भेट देऊन त्यांच्या वडिलांना सांत्वन दिले. परिसरातील अनेकजण सुमित यांना ओळखत होते आणि त्यांच्या शांत, संयमी स्वभावाबद्दल आदर व्यक्त करत होते.
सहवैमानिक देखील अनुभवसंपन्न
सहवैमानिक कॅलाइव्ह कुंदर यांना सुमारे 1100 तासांचे उड्डाण अनुभव होते. अपघाताच्या वेळी सुमित मुख्य पायलट होते तर कुंदर को-पायलटच्या भूमिकेत होते. दोघेही प्रशिक्षित आणि अनुभवी असूनही अपघात झाल्याचे दुर्दैव मानले जात आहे.
विमान अपघाताची चौकशी सुरू
DGCA (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल अॅव्हिएशन) आणि विमान कंपनी एअर इंडिया या अपघाताची तांत्रिक चौकशी सुरू करत आहेत. विमानातील ब्लॅक बॉक्स सापडले असून त्याचे विश्लेषण सुरू आहे. त्यामधून अपघाताचे नेमके कारण समजण्यास मदत होईल.
कॅप्टन सुमित सबरवाल हे केवळ एक अनुभवी पायलट नव्हते, तर ते वैमानिकांच्या नव्या पिढीला प्रशिक्षण देणारे मार्गदर्शक होते. त्यांनी हजारो तास आकाशात घालवले, अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. मात्र, नियतीपुढे सर्व शक्ती कमी पडल्या. त्यांच्या निधनाने वैमानिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
या भयानक अपघाताने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. 242 जिवांची हानी ही केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही, तर ती कित्येक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी प्रशासनाकडून डीएनए चाचण्यांची प्रक्रिया सुरू आहे, आणि नातेवाईकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
💔 एक भावनिक संदेश:
“हे केवळ एक अपघात नव्हता, तर अनेक स्वप्नांचं आणि कुटुंबांचं अकल्पनीय विघटन होतं… आपण सर्वांनी एकत्र येऊन या कठीण काळात शोकाकुल कुटुंबांप्रती सहवेदना व्यक्त कराव्यात.”
READ MORE
- अहमदाबाद विमान दुर्घटना: विजय रुपाणी यांचा मृत्यू, २४२ प्रवाशांचा अंत – भारतासाठी काळा दिवस
- एअर इंडिया फ्लाइट क्रॅश: मोठी विमान दुर्घटना अहमदाबाद येथे रहिवासी वस्ती वर कोसळले विमान
- दिवा-कोपर स्थानकदरम्यान लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू – मुंबई लोकलमधील गर्दीने घेतले बळी
ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट्स आणि हवामान इशाऱ्यांसाठी आमचा WhatsApp चॅनेल लगेच जॉइन करा!
✅ विश्वसनीय मराठी बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर
📰 दररोज महत्वाच्या घडामोडींची झटपट माहिती