पुणे – महाराष्ट्रात दरवर्षी प्रमाणे , महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला .
यावर्षी सुद्धा विध्यार्थी उत्तीर्ण होण्यामध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. पुण्यातील एम.एस. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थिनी , रावी नामजोशी हिने 100 % गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
विशेष म्हणजे तिने कोणतीही खासगी क्लास (ट्युशन) न लावता केवळ शाळेतील शिक्षक व स्वतःच्या मेहनतीने व पालकांच्या मार्गदर्शनातून हे यश मिळवले आहे.
यातून हे सिद्ध होते कि शिक्षण किती मोठ्या शाळेत किंवा किती मोट्या क्लास मध्ये तुम्ही शिकताय हे महत्वाचे नसून तुमची आवड आणि मेहनत हि यशाची खरी गुरुकिल्ली आहे . शिक्षण हे फक्त माहिती देण्याचे काम करते , तुम्ही त्याचा पुरेपूर वापर कसा करता हे पूर्णपणे विद्यार्थ्यांवर अवलंबून असते
घरच्या घरीच अभ्यास करून दहावीत मिळवले उतुंग यश
रावीने सांगितले की, “मी दहावीत कोणताही क्लास लावलेला नव्हता. घरीच अभ्यास केला. माझा अभ्यास शाळेतील शिक्षक आणि घरी आई-बाबा घेत होते. मला खात्री होती की मला चांगले गुण मिळतील. निकालाच्या दिवशी जेव्हा मी निकाल पाहिला, तेव्हा माझे 100 टक्के गुण पाहून खूप आनंद झाला. रावीने तिच्या या यशाचं श्रेय तिच्या शाळेतील शिक्षक तिचे आई-वडील आणि तिच्या मेहनतीला दिले आहे.
तिच्या म्हणण्यानुसार, नियमित अभ्यास, सातत्य आणि सराव हेच यशाचे मुख्य सूत्र होते. तिने कोणतेही ठराविक तास ठेऊन अभ्यास केला नाही, पण दररोज नियमितपणे सर्व विषयांचा सराव केला.
रावीला भविष्यात : विज्ञान शाखा घेऊन संशोधन करण्याची इच्छा
रावीचा पुढील शिक्षणाचा निर्णयही निश्चित आहे. ती विज्ञान शाखा निवडणार असून पुढे बेसिक सायन्समध्ये संशोधन (Fundamental Research in Science) करण्याची तिची इच्छा आहे. त्यामुळे रावी अकरावी साईन्स ला ऍडमिशन घेणार आहे . रावीसारख्या विद्यार्थिनीच्या यशामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांसमोर प्रेरणादायी उदाहरण उभं राहिलं आहे की मेहनत, नियमितता आणि योग्य मार्गदर्शनाने कोणीही मोठं यश मिळवू शकतो त्यासाठी कोचिंग क्लासेस आवश्यक नाहीत.
महाराष्ट्रातील विभाग अनुसार निकालाची आकडेवारी
यंदा राज्यभरातून एकूण 211 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले, यामध्ये लातूर विभाग आघाडीवर असून तिथून 113 विद्यार्थी शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागातून 13 विद्यार्थी हे 100 % गुण मिळवणाऱ्यांमध्ये आहेत. यामध्ये रावी नामजोशीचा समावेश आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
- कोकण – 99.82%
- कोल्हापूर – 96.78%
- मुंबई – 95.84%
- पुणे – 94.81%
- नाशिक – 93.04%
- अमरावती – 92.95%
- छत्रपती संभाजीनगर – 92.82%
- लातूर – 92.77%
- नागपूर – 90.78%
या निकालांवरून स्पष्ट होते की कोकण आणि कोल्हापूर विभागात सर्वाधिक उत्तम कामगिरी पाहायला मिळाली, तर पुणे विभागानेही चांगला निकाल नोंदवला आहे.
यंदाही महाराष्ट्रात मुलीच आघाडीवर
महत्त्वाचे म्हणजे, यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. संपूर्ण राज्यभरात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असून, टॉप स्कोअरर्समध्येही मुलींची संख्या अधिक आहे. हे पाहता विद्यार्थिनींची मेहनत आणि शिक्षणातील वाढती प्रगती ही समाजासाठी सकारात्मक संकेत देणारी बाब आहे.
यंदाही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.14% इतके असून, मुलांचे प्रमाण 92.31% आहे. मागील वर्षीही मुलींनी 97.21% यश मिळवत मुलांच्या 94.56% च्या तुलनेत आघाडी घेतली होती. यंदा 7,22,968 मुलींनी परीक्षा दिली असून, त्यापैकी 6,95,108 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांपैकी 8,23,611 पैकी 7,60,325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूणच मुलींचे यशाचे प्रमाण मुलांपेक्षा 3.83 टक्क्यांनी अधिक आहे.
रावी कडून कोणता धडा मिळतो
पुण्यातील रावी च्या यशामुळे पुन्हा एकदा हे अधोरेखित होते की कोणतीही शिकवणी न घेता केवळ शाळेतील शिक्षण, पालकांचे पाठबळ आणि स्वतःची शिस्त उत्तुंग यश मिळवण्यासाठी पुरेशी असते . ही तिची कहाणी इतर विद्यार्थ्यांसाठी आणी त्यांच्या पालकांसाठी प्रेरणास्थान ठरणारी आहे. दहावीत येणाऱ्या विध्यर्थ्याना यातून चांगली शिकवण मिळेल आणि आत्मविश्वास वाढण्या साठी मदत होईल , यशासाठी गरज असते ती फक्त चिकाटीची, समर्पणाची आणि योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांची.
READ MORE