“मागेल त्याला सौर कृषी पंप” योजनेला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद; बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचे महावितरणचे आवाहन
पुणे : 18 May 2025 “मागेल त्याला सौर कृषी पंप” या योजनेला राज्यातील शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभत असून, महावितरणकडून ही योजना पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जात आहे. परंतु याच पार्श्वभूमीवर, काही बनावट एजंटांकडून शेतकऱ्यांना फसवणूक करणारे कॉल आणि मेसेज येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा कॉल्सना बळी न पडता, कोणालाही अतिरिक्त पैसे न देता सतर्क राहावे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
मागेल त्याला सौर कृषीपंप योजने ची संपूर्ण माहिती
शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजांसाठी एक शाश्वत, स्वतंत्र आणि हक्काची योजना सरकारने आणली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषीपंप आणि सौर पॅनेल्सचा संपूर्ण संच अत्यंत कमी खर्चात उपलब्ध होणार आहे. सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना केवळ १० टक्के रक्कम भरावी लागेल, तर अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांसाठी हा हिस्सा केवळ ५ टक्के असेल. उर्वरित खर्चाचे अनुदान केंद्र व राज्य सरकारकडून दिले जाईल.
या योजनेत ३ HP ते ७.५ HP क्षमतेचे सौर कृषीपंप दिले जातील, जे शेतजमिनीच्या क्षेत्रावर आधारित असतील. उदा., २.५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ३ HP, २.५१ ते ५ एकर असलेल्या शेतकऱ्यांना ५ HP, तर ५ एकरपेक्षा जास्त क्षेत्र असल्यास ७.५ HP क्षमतेचा सौर पंप दिला जाईल. तसेच, जर शेतकऱ्याने या क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचा पंप मागितला, तरीही तो मान्य केला जाईल.
प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक
“मागेल त्याला सौर कृषी पंप” ही योजना राज्य सरकारच्या सहकार्याने महावितरणद्वारे राबविण्यात येत असून, यामध्ये शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून केवळ दहा टक्के रक्कम भरायची असते. उर्वरित 90 टक्के रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाते. यामध्ये केंद्र सरकारकडून 30% आणि राज्य सरकारकडून 60% इतके अनुदान दिले जाते. अनुसूचित जाती-जमातीतील लाभार्थ्यांसाठी केवळ 5% रक्कम भरण्याची सवलत आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर, त्यांनी निवड केलेल्या अधिकृत एजन्सीकडून त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यात येतो. एकदा नोंदणी पूर्ण झाल्यावर प्रतीक्षा यादीत नाव समाविष्ट होते आणि त्या यादीनुसारच पंप बसविण्याची प्रक्रिया पार पडते. कोणालाही प्रतीक्षा यादीत बदल करता येत नाही, व इतर कोणत्याही मार्गाने प्राधान्य मिळू शकत नाही.
महावितरण सांगते बनावट कॉल्स वर शेतकऱ्यांनी विस्वास ठेऊ नये
कृषीपंप लवकर मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांकडे बनावट कॉल्स येत आहेत, ज्यामध्ये असे सांगितले जाते कि “प्रतीक्षा यादी न पाहता थेट पंप देतो”, “थोडी रक्कम भरली की पंप लवकर मिळेल”, अशा प्रकारच्या अमिषाने शेतकऱ्यांना फसवले जात आहे. हे कॉल बनावट असून यामागे फसवणूक करणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे.
महावितरणने अशा प्रकारच्या कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवू नका, अशा कॉल्सला प्रतिसाद देऊ नका आणि त्यानुसार कोणालाही रक्कम देऊ नये, असा स्पष्ट इशारा दिला आहे. जर अशा प्रकारचा कोणताही कॉल शेतकऱ्यांना आला, तर त्यांनी Mahavitaran च्या 1800234355 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी.
वाहतूक खर्च आणि साहित्य मागणीवरही तक्रारी
महावितरणकडे अजून काही तक्रारी आल्या आहेत त्यामध्ये असे समोर आली आहे की, काही ठिकाणी अधिकृत एजन्सीकडून कृषी पंप बसविताना शेतकऱ्यांकडे वाहतूक खर्च किंवा अतिरिक्त साहित्याची मागणी केली जात आहे. अशा तक्रारी महावितरणकडे प्राप्त झाल्या असून याची गंभीर दखल घेतली जात आहे. अधिकृत एजन्सीने कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च मागणे हा नियमबाह्य प्रकार आहे.
महत्त्वाचे मुद्दे शेतकऱ्यांसाठी
- अर्ज केल्यानंतर प्रतीक्षा यादीनुसारच सौर कृषी पंप बसवले जातात.
- केवळ 10% रक्कम भरल्यानंतरच पंप बसवण्याची प्रक्रिया सुरू होते.
- कोणालाही अतिरिक्त रक्कम देण्याची गरज नाही.
- बनावट कॉल्सपासून सावध राहा आणि तत्काळ तक्रार नोंदवा.
- कोणतीही अधिकृत माहिती फक्त Mahavitaran च्या संकेतस्थळावर किंवा टोल फ्री क्रमांकावरूनच मिळवावी.
सौर कृषीपंप बिघाडल्यास तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया
जर सौर कृषीपंप नादुरुस्त झाला किंवा त्यासंदर्भात शेतकऱ्यांना काही अडचण आली, तर त्यांनी त्वरित महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राशी संपर्क साधावा. आपली तक्रार नोंदविण्यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक 1800-233-3435 किंवा 1800-212-3435 वर कॉल करता येतो. शेतकऱ्यांकडून आलेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठवली जाईल आणि त्या एजन्सीद्वारे तक्रारीचे निराकरण केले जाईल. या प्रक्रियेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना वेळीच सेवा मिळावी आणि त्यांच्या सिंचनाच्या कामात अडथळा येऊ नये.
शेतकऱ्यांनी घ्यावी खबरदारी
या योजनेत मोठ्या प्रमाणात सरकारी अनुदान असून त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांचे लक्षही या योजनेवर आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी अधिक जागरूक राहून, केवळ अधिकृत माध्यमातूनच व्यवहार करावेत. शंका असल्यास Mahavitaran च्या स्थानिक कार्यालयात किंवा टोल फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
मागेल त्याला सौर कृषीपंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषीपंप मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. इच्छुक शेतकऱ्यांनी खालील लिंकवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरावा:
https://offgridmtsup.mahadiscom.in/AGSolarPumpMTS/PMKusumCons?uiActionName=getA1Form
READ MORE
रस्ते अपघातग्रस्तांना मिळणार ₹1.5 लाखांपर्यंत मोफत उपचार ‘कॅशलेस उपचार योजना सुरू
“श्री स्वामीनारायण मंदिर पुणे – नयनरम्य कोरीव काम पाहून तुम्ही थक्क व्हाल!”
करिअरसाठी फायदेशीर असे ट्रेंडिंग ITI कोर्सेस कोणते आहेत ते जाणून घ्या